Wednesday, 29 August 2012

नशिबाचा खेळ


मन्याच्या मनात काही तरी वेगळेच होते... तिच्याकडे जाऊन धिंगाणा घालायचा ..चार शिव्या हासडून मन हलके करायचे आणि मग तोंडातली लाळ थुंकून निघून यायचे ... असा विचार डोक्यात आला असतानाच त्याने सगळे जुने प्रसंग आठवून पाहिले ... थोडावेळ शांत डोक्याने विचार करून त्याने त्याचा बेत रद्द केला...
काय करणार ... मनात सगळे कोंडले गेले होते .. थंड वाऱ्याची झुळूक एकाकी उष्ण व्हावी किंवा बसलेल्या खुर्चीचा पायच मोडून

पडावा अशी अवस्था त्याच्या मनाची झाली होती ..... एकवेळ तुटलेली काच जोडता येते पण तुटलेले हृदय पुन्हा कसे जोडले जाणार..... आणि मग त्याच तुटक्या हृदयातून नैराश्य आणि क्विचीतच स्वतःबद्दलची घृणा , संताप आणि अश्रूच जन्माला येते..
मनावर दगड ठेवून त्याने हे सत्य स्वीकारले... पुढे काय वाढून ठेवले आहे हे आपल्याला माहित नसल्याने त्याने नव्याने जगायला शिकायला हवे असे त्यालाही वाटत होते... पण ... पण.. जुन्या जखमा कालांतराने पुन्हा पुन्हा ओल्या व्हायच्या ... कोणीतरी त्या जखमेवरची खपली काढावी अशागत सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यांसमोर यायच्या .... एका क्षणात होत्याचे न्हवते तर फक्त पूर , भूकंप अश्या आपत्तीत येते पण ही आपत्ती नैसर्गिक न्हवती तर भावनिक गुंतागुंतीची , विश्वासाची आणि प्रेमावर आलेली आपत्ती होती ...

आज पुन्हा तो त्याच ठिकाणी आला होता जिकडे "ते दोघे " पहिल्यांदा भेटले होते... त्याचठिकाणी .... स्वतःची स्कुटी पार्क करून ती उभी होती आणि हा तिथे पोहोचला .. ओठात कुठलेसे मराठी प्रेमगीत गात ..... तीच . होय तीच उभी होती ... आवाजावरून जशी वाटत होती त्याला तशीच प्रत्यक्षात असणारी .... आज तेच सारे आठवले त्याला .... अलगद मग तो त्या कट्ट्याच्या बाजूला उभा राहिला .. तेच मागचे सारे आठवले .. तिने लडिवाळपणे त्याला मारलेले फटके , ओढलेले कान आणि तोही अगदी येणाऱ्या जाणाऱ्यांकडे आपण काहीतरी "कमावले " असल्याचा अविर्भाव दाखवत बघणारा..... डोळ्यातले ते थंड पाणी त्याच्या निळ्या जीन्स वर अलगद पडले ...

तो समोरचा चहावाला आजदेखील वाफाळता चहा बनवत होता.... "दोन कटिंग" त्याने त्याच्याकडे ऑर्डर दिली .. चहावाल्याने देखील त्याला बघून नेहमीप्रमाणे दोन स्पेशल ग्लास दिले... " आज तू एकटाच ... ? " त्याच्या जखमेवरची खपली पुन्हा एकदा निघाली ... "होय.. असच " ... पहिला ग्लास गटागटा पिऊन दुसरा ग्लास तिच्यासारखाच स्वतःच्या रुमालाने धरून फुंकर मारून पीत होता... चहावाला कळून चुकला.... त्यानेही आज एकाच कटिंग चे पैसे घेतले होते ...
मनातले दु:ख अलगद त्याच्या डोळ्यात आले होते .. तसाच चालत चालत तो त्या बागेजवळ गेला आणि स्वतःशीच बडबडला :

नशिबाचा खेळ असतो सारा... कधी ऊन तर कधी वारा ...
झोकून द्यावे हृदयातले सारे .. कधी न मोजावे आकाशातील तारे ...
मोडेल मग कधी असा एक डाव ... हरवेल तसाच मग मनीचा भाव ....
तुटलेले सारे कधी कसे जोडावे ? का हे असेच हे सारे आपल्याचसाठी घडावे ? ...
का हे असेच हे सारे आपल्याचसाठी घडावे ? ...

-- विकास सोमण
मालाड , मुंबई -९७

Tuesday, 28 August 2012

जीना इसी का नाम है !!!

आज नेहमीची ८.५२ चर्चगेट फास्ट चुकली .... पुढल्या ट्रेनची वाट पाहत उभा होतो .. समोरच्या फलाटावर एक बाई मोठ्या मोठ्याने बडबडत होती ... असंबद्ध बडबड अव्याहतपणे .. तिच्याकडे बघितले आणि तिच्या बोलण्यावरून जाणवले की कोणाचे तरी फ्रसस्ट्रेशन ती बाहेर काढत होती .... एकाकडून कळले की तिचा हा रोजचा शिरस्ता आहे .... बाईचे राहणीमान चांगले दिसत होते... म्हणजे वेडी तर ती मुळीच न्हवती .. ट्रेन आली आणि रोजच्यासारखे
"लटकून " जाण्याशिवाय पर्याय न्हवता.... मनात असंख्य विचार भरकटत होते ...

खरच .. लोकल मधली ही गर्दी कधी कधी खूप ज्ञान देऊन जाते ... लोकलमधले ग्रुप्स तर अनेक गोष्टींची चर्चा करत असतात ... म्हणजे अगदी भारतीय अर्थव्यवस्था , आयकर , रतन टाटांची शेवटची ए जी एम ते शेअर मार्केट आणि "सनी लिओन" ... अगदी अपशब्दांची डिक्शनरी सुद्धा ह्याच लोकलमध्ये ऐकायला मिळेल .... भजनी मंडळांचे भजन असो किंवा एखादे हौशी गाणारे असोत... मयेकर काकांचे प्रमोशनचे पेढे असोत वा शहाच्या इंट्रा डे लॉस चे सांत्वन असो .... आपला मुलगा लंडनला जाणार म्हणून खुश आणि दु:खी झालेला कार्तिक काका असो किंवा नवीन नोकरीच्या शोधातला चेतन असो .. सगळेच जवळचे वाटतात ... तुझ्या मुलासाठी फी चे पैसे कमी पडत आहेत काळजी करू नकोस आम्ही सर्व मिळून वर्गणी काढतो... " अरे तुझा मुलगा उद्या डॉक्टर झाला तर आम्ही त्याच्याकडेच येऊ ना .. फुकट मध्ये उपचार करायला " असे आधाराचे मित्र असोत... सारे काही इथेच अनुभवास येते... "तने छोकरी थई गयी बहु नशिबवान छे तू ... छोक्रो मा बाप नु ध्यान राखतो नथी .. छोकरी सरस छे .." असे सांगून मुलगी झाल्याबद्दल पार्टी मागणारे पटेल असोत... किंवा आपल्या घरचे टेन्शन मैत्रिणीकडे मांडणारी एखादी नवविवाहित मुलगी असो... एक कुटुंबच जन्माला येते....

फेसबुकवर जसे कोणी कोणाचे ओळखीचे नसलेले मित्र मैत्रिणी एक येतात आणि नवे नाते तयार होते तसेच हे एक सव्वा तासाच्या रोजच्या प्रवासात निर्माण झालेले वर्चुअल जग सारे काही शिकवून जाते ..
मुंबईकरांचे निम्मे आयुष्य हे प्रवास करण्यात जाते असा समज बऱ्याच लोकांत आहे .... आणि काही अंशी तो जरी खरा असला तरी आपल्या अनुभवांची झोळी तो ह्याच प्रवासादरम्यान भरत असतो .... केल्याने देशाटन मनुजा चातुर्य येतसे फार असे म्हटले आहे ... पण मुंबईकरांच्या बाबतीत केल्याने "लोकलाटन" मनुजा चार्तुय येतसे फार असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही ....

मुंबईकरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली ही मुंबई लोकल कितीतरी चांगल्या - वाईट गोष्टी शिकवत राहते.. एकीची भावना जागृत करते.... एक नवे स्पिरीट देते .... का कुणास ठाऊक पण मुंबईकर मोठ्या जिद्दीचा आणि कधीही हार न मानणारा मानला जातो .. कदाचित ही ताकद इथूनच मिळत असावी ... असह्यता म्हणा किंवा पर्याय नाही म्हणा ..पण शेवटी जो तळे राखतो तोच पाणी चाखतो .. हेच स्पिरीट मुंबईकर राखतो आणि अगदी पाकिस्तानसारख्या दहशतवादी राष्ट्राला सुद्धा मुंबईचे हेच स्पिरीट कमी करण्यात अपयश येते ...

किसीकी मुस्कुराहोन पे हो निसार
किसीका दर्द ले सके तो ले उधार
किसीकी वासते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है !!!

-- विकास सोमण
मालाड, मुंबई - ९७